ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी “श्री” लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त !
त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की,
दिल्ली पर्यंत यायला पैसे नाहीत
“पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब !
अजब आणि अफाट आहे न हे ? मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची.
कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी,
कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे.
आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या “हलधर ग्रंथावली – भाग -2” याचा पाठयक्रमात समावेश करण्यात आलाय.
साधाच वेष, शक्यतो पांढर धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत .
हि खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो करतात. आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधर जी सारखे आहेत. चॅनेलवाल्याचे यांच्याकडे लक्ष कधी गेले तर याना पद्मश्री जाहीर झाल्यावर !
श्री हलधर जी याची जीवनकहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल.
ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले, आईवडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधरजी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडवि लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्याची दया आली व यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले. तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं.
नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन – पेन्सिल – शालेय वस्तूच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले. आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले.
आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो. श्री हलधर जी यांनी 1995 च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत “राम शबरी” सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे. पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली. अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले. आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची हि कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाला.
अजून एक कहर म्हणजे स्वतः हलधरजी फक्त तिसरी पर्यत शिकलेलं पण आजमितीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत.
त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटत की,
आप किताबो में प्रकृति को चुनते है
पद्मश्री ने, प्रकृति से किताबे चुनी है।।
डीडी क्लास : भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधरजी सारख्या लोकांची चरित्रे का वाचायची ? तर आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी. “सगळी परिस्थिती वाईट आहे. नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असत” अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच हलधर नाग यांची कहाणी प्रेरणादायी आहे.

