अहेरी : कॉन्व्हेंटच्या शिक्षकांना इंग्रजीचे दोन-चार शब्द बोलता आले तर इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट पालकांना ‘लई भारी’ वाटतात. आकर्षण असते. याच आकर्षणातून कॉन्व्हेंट मोठ्या व्हायला लागल्या आहेत. दुसरीकडे दिवसेंदिवस मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत आहेत. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट मध्ये टाकण्यात शिक्षक वर्ग प्रचंड आघाडीवर आहे. स्वतः शिक्षक असून मी आपल्या मुलाला माझ्या शाळेत शिकवू शकतो आणि मोठा करू शकतो ही इच्छाशक्ती शिक्षकांमधून संपून गेली आहे. कॉन्व्हेंट शिक्षणाच्या या विश्वात एक ‘अवलिया’ शिक्षक आपले वेगळेपण दाखवत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेंकटरावपेटा ता. अहेरी, जि. गडचिरोली येथील बिच्छू वड्डे यांनी मराठीशी इमान राखत आपल्या मुलाला आपल्याच शाळेत दाखल केले असून तो चौथ्या वर्गात आहे. बालवयातच स्पर्धा परीक्षेचे चित्र बिच्छू वड्डे आपल्या मुलावर कोरत आहेत. स्पर्धा परीक्षा कशी असते ?, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे काय ?, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा याची संपूर्ण माहिती व्हावी. यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
मुलाच्या प्रयत्नाला हत्तीचे बळ मिळावे. यासाठी त्यांनी जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या भेटीचा प्रस्ताव ठेवला. बिच्छू वड्डे यांचा दहा वर्षीय मुलगा आरुष याचे आकर्षण लक्षात घेता सुहास गाडे यांनी भेटीला तात्काळ होकार दिला. नुकतीच आरुष आणि सुहास गाडे यांची जिल्हा परिषद गडचिरोली मध्ये भेट घडून आली. या भेटीची संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात चर्चा आहे.
आरुष आणि सुहास गाडे यांच्या भेटीत काही गोष्टीं महत्त्वाच्या ठरत आहेत. बिच्छू वड्डे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षक आहेत. बहुतेक पालक मराठी माध्यमांच्या शाळेत शिकून नोकरीवर लागले आहे. यात बरेच शिक्षक आहेत. काळ बदलला. इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटचे पीक दिवसेंदिवस वाढायला लागले. इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता काय आहे. याची खातरजमा न करता मोक्याच्या गावात नोकरीवर असलेला बहुतेक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील दोन-चार शिक्षक थोडेफार इंग्रजीत बोलले तरी याचा प्रभाव पडतो. यातून जवळपास सगळेच पालक आपल्या पाल्याला इंग्रजीमध्ये माध्यमाच्या शाळेत शिकवीत आहेत. याला बिच्छू वड्डे अपवाद ठरले. आरुष हा त्यांचा चार वर्षाचा मुलगा. ते सहज आरुषला कॉन्व्हेंट मध्ये शिकवू शकले असते. बिच्छू वड्डे शिक्षक आहेत. आदिवासी समुदायातील आहेत. त्यांच्यासाठी मातृभाषा मराठी असली तरी मुळात त्यांची मातृभाषा आदिम समुदायातील आहे. ‘प्रिय आमचा महाराष्ट्र हा’ आणि मराठीशी इमान राखत त्यांनी आपल्या मुलाला मराठी शाळेत टाकले. मराठी माध्यमाचे शिक्षण देताना त्यांनी स्वतः नोकरी करत असलेल्या शाळेची निवड केली. मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत टाकून इतरांसमोर आदर्श निर्माण केला. मराठी शाळा टिकल्या पाहिजे. मराठी शाळा मोठ्या झाल्या पाहिजे हा हेतू सुद्धा स्पष्ट झळकत आहे.
मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत टाकुनच त्यांनी आपल्या कार्यावर पूर्णविराम दिला नाही तर या शाळेतून सुद्धा मुले मोठे होऊ शकतात हे संस्कार ते बालवयात विद्यार्थ्यांवर घडवीत आहेत. मुलगा आरुष सहित इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षेची माहिती देत आहे. स्पर्धा परीक्षेच्या गोष्टी ऐकण्यात आरुषला प्रचंड रस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्पर्धा परीक्षेतून जग जिंकणाऱ्या माणसांची आरुषला ओळख व्हावी या हेतूने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. आरुषची स्पर्धा परीक्षा प्रती असलेली तळमळ पाहून सुहास गाडे यांनी आरुषच्या भेटीला तात्काळ होकार दिला. सुहास गाडे आणि आरुष या दोघांची अविस्मरणीय भेट झाली. स्पर्धा परीक्षा विषयी आरुषची तळमळ पाहून सुहास गाडे प्रभावित झाले. आरुषला त्यांनी अनेक प्रश्न विचारले. जवळपास सगळ्याच प्रश्नांची समर्पक उत्तरे आरुषने सुहास गाडे यांना दिली.
आरुष आणि सुहास गाडे यांचीही भेट आरुष साठी मैलाचा दगड ठरणार आहे. बालवयातच स्पर्धा परीक्षे सारखे संस्कार जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दिल्या गेल्या तर जिल्हा परिषद शाळांचे लयास गेलेले वैभव पुन्हा बहाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
