राजाराम : नक्षल चळवळीला अखेरची घरघर लागली आहे. छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्रासह इतर राज्यातील पोलीस व अन्य सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांची कोंडी केली जात आहे. तेलंगणाच्या करेगुट्टा डोंगरावर नक्षलवाद्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी कैचीत पकडले आहे. पंधरवड्यापासून चकमक सुरू आहे.
नक्षल चळवळ अखेरच्या घटका मोजत असली तरी नक्षल चळवळीने स्थानिक परिसरात अनेक घातपाती कारवाया घडवून आणल्या होत्या. विसरू न शकणारे चटके दिले. अनेकांना जीवनाशी ठार केले. काहींचे अवयव तोडले.न भरून निघणाऱ्या जखमा घेऊन अनेक जण जगत आहेत. यातले एक व्यक्तिमत्व म्हणजे येर्रा बोड्डा आत्राम रा.राजाराम हे आहेत.
1986 च्या दरम्यान स्थानिक परिसरात नक्षल चळवळ जोमाने सक्रिय होती. नक्षली स्थानिक परिसरात फिरायचे. सभा घ्यायचे. बंदुकीच्या धास्तीने गावकऱ्यांना गोळा व्हावे लागत होते. अशीच एक बैठक खांदला राजाराम येथे आयोजित केली होती. बैठकीची सूचना पोलिसांनी मिळाली. पोलीस पोहोचले. चकमक उडाली. भिमण्णा नामक नक्षली मरण पावला.
भिमन्नाच्या मृत्यूने नक्षली बिथरले. कुणाच्या तरी सांगण्यावरून पोलिसांना सभेची कल्पना आली असावी. येर्रा बोड्डा आत्राम यांनी या सभेची कल्पना दिली. असा गैरसमज नक्षलवाद्यांनी करून घेतला. याच गैरसमजातून येरा बोड्डा आत्रामच्या शोधात नक्षली होते. 26 सप्टेंबर 1986 ला येर्रा बोड्डा आत्राम वन उपज गोळा करण्यासाठी जंगलात गेले होते. नक्षलवाद्यांनी त्यांना हेरले. पकडले. जंगलातच त्यांचा हात छाटला. या घटनेला 39 वर्षे पूर्ण झाली आहेत.
‘नक्षलवाद – काल आणि आज’ या विषयावर येर्रा आत्राम यांच्याशी बातचीत असता त्यांनी दिलखुलास चर्चा केली.
येर्रा आत्राम नवव्या वर्गापर्यंत शिकलेले आहेत. 79 वर्षे वय आहे.विविध विषयाचे त्यांना चांगले ज्ञान आहे. गरीब व श्रीमंत यातील भिंत पाडण्यासाठी नक्षलवादाची निर्मिती झाली असली तरी लोकशाहीत याला काही अर्थ नाही. प्रत्येकाला आपापल्या कुवतीप्रमाणे मोठा होण्याचा अधिकार आहे. कुणीच थांबू शकत नाही. बंदुकीच्या नळीतून कुणीच कुणाचे मन जिंकू शकत नाही. बंदुकीच्या भरवशावर 150 वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना शेवटी देश सोडावाच लागला. असेच नक्षल चळवळीचे आज दिसत आहे. 45 वर्षांपूर्वी सुरू झालेली चळवळ आज शेवटच्या टप्प्यात आहे. हिंसेने काहीच साध्य होत नाही. हक्क, अधिकार व न्याय मागण्यासाठी कायद्याने घालून दिलेल्या चौकटीत राहून संघर्ष करता येतो असे ते म्हणाले.
हात तोडल्यानंतर येर्रा आत्राम यांना 1990 च्या दरम्यान शासकीय नोकरी मिळाली. 12 डिसेंबर 1988 ला राजाराम खांदलाचे सरपंच गंगाराम आत्राम यांची नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केली होती. गंगाराम आत्राम काँग्रेसचे होते. शरद पवार त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते. गंगाराम आत्राम यांच्या हत्त्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार राजाराम येथे आले. येर्रा आत्राम यांचा हात तोडण्याची माहिती शरद पवारांना मिळाली होती. त्यांनी त्यांच्या घरी भेट दिली. परिस्थिती जाणून घेतली. शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या. 1990 च्या दरम्यान वर्ग 4 च्या पदावर रुजू झाले. 2006 ला सेवानिवृत्त झाले. 11000 रुपये मासिक निवृती वेतन त्यांना मिळते. मुले, नातवंडासह आनंदी आहेत.
केवळ हात तोडला. पण जिवंत सोडले ही बाब त्यांनी यावेळेस सांगितली. विचारधारा चुकीची असली तरी तत्कालीन नक्षली शिक्षा देताना विचार करायचे. आजच्या नक्षलवाद्यांकडे विचार शिल्लक नाही. म्हणून ते हिंसक आहेत. दयामाया नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे ते जीव घेत आहेत. भूपती, गोपन्ना या नक्षलवाद्यांनी आपला हात तोडला. गावचीच राधक्का यावेळेस होती असे सांगण्यात येते. पण ती जवळ आली नाही. मला दिसली नाही असे ते म्हणाले.
आजच्या युवकांनी शिक्षणावर भर द्यावा असे त्यांनी यावेळेस आवर्जून सांगितले. सगळ्या समस्येचे समाधान शिक्षणात आहे. आदिवासी युवकांना आश्रम शाळा व इतर संस्थांच्या माध्यमातून उच्चशिक्षणापर्यंत पोहोचण्याची संधी शासनाकडून करून देण्यात आली. स्थानिक परिसरातील भौगोलिक परिस्थिती विपरीत असली तरी यावर मात करून आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे आपली प्रगती करावी. आदिवासी विद्यार्थी शिक्षणात पुढे गेला तर तो अन्य मार्गाकडे वळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या दृष्टीने शासनाकडून व्यापक प्रमाणात जनजागरण करण्याची गरज आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
