एकलव्य मारहाण प्रकरण
अहेरी : वस्तीगृह अधीक्षक ईश्वर नारायण शेवाळे अनुसूचित जमातीचे आहेत. निवासी विद्यार्थी सुद्धा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आहेत. आपल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना वळण लागावे. त्यांची प्रगती व्हावी असा शेवाळेचा हेतू होता. म्हणून त्यांच्या हातून असे कृत्य घडले असा दुर्दैवी युक्तिवाद एकलव्य निवासी शाळा अहेरीच्या काही शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चपलेने आणि काठीने मारहाण करण्याचे प्रकरण काल उघडकीस आले. प्रकरणाची वाच्यता समाज माध्यमांवर होताच राष्ट्रवादी तालुका काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष नागेश मडावी यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपबीती ऐकली. प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतली. प्रकरणाला वाचा फोडली. आता प्रकरणाच्या अनुषंगाने विविध चर्चा केल्या जात आहे. यातील ही एक चर्चा आहे.
गेल्या एक महिन्यापासून वसतिगृह अधीक्षक ईश्वर नारायण शेवाळे हा विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करीत होता. अमानुष मारहाणीचा प्रकार एक महिन्यापासून सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी हा प्रकार या शैक्षणिक क्षेत्राच्या सुरुवातीपासून असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराच्या अनुषंगाने विविध चर्चा पुढे यायला लागल्या आहेत. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक मंडळींकडून आपल्याच शिक्षक मंडळींचा दोष कसा लपवण्यात येतो. हे एकलव्य निवासी शाळेमध्ये दिसून येत आहे. विविध कारणे सांगून वस्तीगृह अधीक्षक ईश्वर शेवाळे निर्दोष कसा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार वस्तीगृह अधीक्षक शेवाळे हा बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते. बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील तो आहे. असाही युक्तिवाद करण्यात येत आहे. शेवाळे अनुसूचित जमाती च्या प्रवर्गातला असल्याने व शाळा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची असल्याने विद्यार्थ्या प्रति त्याला मोठा कळवळा असल्याचा आव आणण्यात येत आहे. स्थानिक विद्यार्थी शिक्षणात मागे आहे. जास्तीत जास्त अभ्यास करावा. पुढे जावा. म्हणून तो प्रयत्न करीत होता. असा युक्तिवाद एकलव्याचे काही शिक्षक करीत आहेत. मुख्याध्यापक चंगोराव गंगातीरे यांनी काल केला. नागेश मडावी यांच्याशी चर्चा करताना त्यांनी अशीच भूमिका स्पष्ट केली होती.
शिक्षक आणि मुख्याध्यापकाकडून करण्यात येणारा युक्तिवाद प्रचंड दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांना वळण लावायची असल्यास काही पद्धती असतात. शिक्षा करायची असल्यास सौम्य शिक्षा देण्यास हरकत नाही. पालकही आक्षेप घेत नाही. विद्यार्थी अभ्यास करीत असताना वस्तीगृह अधीक्षक त्यांच्यासोबत बसला असेल. तर निश्चितच विद्यार्थी पुस्तक घेतात. वाचण्याचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न करतात. अधीक्षक, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर प्रभाव असतो. प्रभावातूनच विद्यार्थी कामाला लागतात. हातात चप्पल घेणे, काठी घेणे विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारणे हा प्रकार अभ्यास करून घेण्याचा नाही. तरीपण शिक्षकांसारखी सुजाण मंडळी आपल्या शिक्षकाचा दोष न दाखविता त्याच्या चुकीच्या कृत्याचे समर्थन करतात हा प्रकार निषेधाच्या पातळीत मोडत आहे. एकलव्याच्या शिक्षकांकडून करण्यात येणाऱ्या युक्तिवादाची चर्चा चांगलीच रंगली आहे. यांना शिक्षक तरी कसे म्हणता येईल असा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे.
