काही दुकानदारांकडून जुन्या नोटा माथी मारण्याचा प्रयत्न
अहेरी : अहेरीच्या बाजारात सुट्टया नोटांचा म्हणजेच चिल्लरचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही दुकानदारांकडे चलनात असलेल्या पण निकामी झालेल्या नोटा आहेत. एका दुकानदाराकडून निकामी नोट घेतली तर बाजूचा दुसरा दुकानदार ही नोट स्वीकारत नाही. तरी अशा नोटा ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न काही दुकानदारांकडून होत आहे. एखाद्या ग्राहकाने जुन्या नोटा घेण्यास नकार दिला तर त्यासोबत काही दुकानदार निरर्थक वाद घालण्याचा किळसवणा प्रकार सुद्धा करीत असल्याचे लक्षात येत आहे.
काही दुकानदारांना दहाच्या नाण्याची सुद्धा ऍलर्जी आहे. तेलंगणामध्ये 10 चे नाणे स्वीकारल्या जात नाही. बसवाहक सुद्धा 10 चे नाणे घेत नाही. तेथे निर्माण झालेल्या गैरसमजाची कीड अहेरीतील काही दुकानदारांना झाली आहे. काहीकडून दहाचे नाणे घेण्यास नकार देत असल्याने या दुकानदारांना चलनाचे नियम कोण समजून सांगावे हा भला मोठा प्रश्न सुजाण ग्राहकांना पडला आहे. केंद्र सरकारने चलनातून एखादी नाणे बात केले नसेल तर ते स्वीकारावेच लागते अन्यथा तो गुन्हा आहे. याची कल्पना दुकानदारांना नाही.
रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून नोटांची छपाई करण्यात येत असते. छपाई करण्यात आलेल्या नोटा काही वर्षानंतर जीर्ण होतात. जीर्ण झालेल्या नोटा बँकेत गोळा करून नवीन नोटा प्राप्त कराव्या लागतात. जीर्ण नोटाच्या संदर्भात हा नियम आहे. प्रामुख्याने व्यवहारामध्ये दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणात नोटांची येणे-जाणे असते. जीर्ण नोटा गोळा होत असतील तर त्या नोटा अन्य ग्राहकांच्या माथी मारून पुन्हा पुन्हा चलनात आणण्यापेक्षा बँकेत जमा करून नवीन नोटा प्राप्त करणे हा उत्तम उपाय आहे. जीर्ण नोटा ग्राहकांच्या माथी मारणे आणि पुन्हा वारंवार त्या चलनात आणणे या साखळीत शेवटी दुकानदारांना त्रास होतो. ही बाब काही दुकानदारांच्या डोक्यापलीकडची आहे. हे दुकानदार अशा नोटा ग्राहकांना देतात ग्राहक पुन्हा दुसऱ्या दुकानदारांना देतात. आणि यातूनच काही दुकानदारांकडून ग्राहकांशी किरकोळ वादही होतात. आम्हाला आल्या आम्ही तुम्हाला देतो असा निरर्थक युक्तिवाद करीत आहे. असा युक्तिवाद दुकानदाराकडून केल्या जात असला तरी मग अशा नोटा ग्राहकांकडे कुठून आल्या हा प्रश्न उपस्थित केला असता दुकानदार चुप्पी साधत आहे. कोण्या तरी स्थानिक दुकानदाराकडूनच ग्राहकालाही नोट प्राप्त होते. किंवा बाहेरनही होत असेल तरी पण ती दुकानदाराकडूनच प्राप्त होते ही बाब समजून घेण्याची कुणाचीच तयारी नाही. फक्त आपल्या नोटा निघून गेल्या पाहिजे हाच हेतू दुकानदारांचा दिसतो. दुकानदाराकडून असा प्रयत्न केला जात असला तरी अशा नोटा आपल्याच बाजूच्या किंवा गावातल्या दुकानदाराकडे जातात याबाबत मात्र काही दुकानदारांना घेणे-देणे नाही. आपल्याकडील जुना नोटा संपल्या पाहिजे. हाच हेतू असतो. “सबसे बडा रुपय्या’ हे सूत्र हे असे दुकानदार उपयोगात आणत आहेत.
