भारतात विवेकावादाचा उदय हा मुख्यत: बुध्दाच्या शिकवणुकीतून झाला. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास बुध्दाचा विचार हाच विवेकवाद होय. विवेक व वैज्ञानिक विचाराची सुरुवात व तिच्या उच्चतम टोकाचा काळ हा ई.स.पूर्व ६०० ते ई.स.४०० पर्यंतचा समजण्यात येतो. बुद्धांनी सृष्टीतील भौतिक घडामोडी, तिची रचना व त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यावर प्रस्थापित विचारांच्या विरोधी तर्कशुध्द विचार मांडले. त्यांना आंधळे शब्दप्रामाण्य मान्य नव्हते. तर प्रचीती, तर्क, अनुभव व परिणीती यांच्या पडताळ्यानेच कोणतीही गोष्ट मान्य केली पाहिजे असे म्हटले होते. समाजात दु:ख होते परंतु प्रचलित व्यवस्थेत त्याचे मूळ कारण सापडत नव्हते. सृष्टीतील नियमाच्या आकलनासाठी कर्मकांड व श्रद्धेऐवजी बुद्धीप्रामाण्याचा विचार व्हावा असे सांगत त्यांनी स्वर्ग, आत्मा व पुनर्जन्म यास स्पष्टपणे नकार दिला, कारण त्यांना यांच्या अस्तित्वाची कोणतीही प्रचीती येत नव्हती. बुध्दाची ख्याती ऐकून एक स्त्री रडत आपल्या मृत झालेल्या मुलास जिवंत करण्यास घेवून आली. बुध्दाचा विवेक ऐकण्यास तयार नव्हती. बुध्द म्हणाले, ज्या घरी आजपर्यंत कोणाचाच मृत्यू झाला नाही त्या घरून मुठभर माती घेवून ये, मग मी मृत मुलास जिवंत करेल. तिने प्रत्येक घर शोधले पण कुठेही विनामृत्यू झालेले घर मिळाले नाही. ती हताशपणे बुध्दाकडे परत आली. बुध्द म्हणाले, मरण हे अटळ असते, ते कोणालाही टाळता येत नाही आणि मेलेल्या व्यक्तीला कधी जिवंत करता येत नाही. अशा प्रकारे प्रचीतीतून त्यांनी आत्म्याचे अस्तित्व व पुनर्जन्म यास स्पष्ट नकार दिला.
बुद्ध हे केवळ विवेकवादावर थांबले नाहीत तर त्यांनी धर्म संकल्पनांना बाजूला सारून मानवतावादाच्या कल्पना प्रगल्भ केल्या. नंतरच्या काळात बुध्दाच्या भूमिकेचे अनेक पाश्चात्य तत्ववेत्त्यांनी समर्थन केले. व्हाॅल्टेअर धर्मासंबंधी म्हणाले की, धर्म म्हणजे दुसर तिसर काही नसून बेदरकार बदमाशानी अज्ञ जनतेची निरंतर पिळवणूक करण्याकरिता जाणून बुजून रचलेला कट होय. नदीच्या काठावर बसलेल्या बुद्धाकडे एक व्यक्ती यज्ञ, होमहवन, पूजापाठ व मंत्राने सर्व काही साध्य करता येते असा दावा करू लागला. यावर बुद्ध म्हणाले, जर तुमच्या मंत्रतंत्र व पूजापाठात ताकद असेल, तर त्याद्वारे मला नदीच्या या काठावरून दुसऱ्या काठावर घेवून चल. मग, ब्राम्हण पुरोहित गांगारून हे कसे शक्य आहे? असे म्हणू लागला. नदीच्या दुसऱ्या काठावर जाण्यासाठी बोटीचाच वापर लागेल. तेव्हा बुध्दाच्या कार्यकारण तत्वज्ञानाने प्रभावित होत त्यांचे शिष्यत्व पत्करले. अशाप्रकारे बुध्दाने यज्ञ, पूजापाठ व मंत्राद्वारे माणसाच्या दैनंदिन क्रियेत बदल घडून येतो हे खोटे ठरवीले. एखाद्या गोष्टीची प्रचीती येत नसतानाही तिला मानणे हे ढोंग असल्याचे सांगत साधन व क्रीयापक्रीये द्वारेच प्रगती साधता येते हे सांगत प्रचलित धर्मधारनेला व पुरोहितांच्या भोंदुगिरीला छेद दिला.
संतोष चिकाटे, आलापल्ली
