अहेरी : अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा या पाच तालुक्यातील महिला व लहान मुलांना उपचार सोयीचे व्हावे म्हणून आलापल्ली रोड स्थित महिला व बाल रुग्णालय उभारण्यात आले. बाहेरून रुग्णालय पूर्ण झाल्याचे जनतेस दिसत आहे. रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असली तरी आतील काम अद्याप पूर्ण व्हायचे आहे. आतील कामाला पुन्हा तीन महिने लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे या महिला व बाल रुग्णालयाला सुरू होण्यासाठी तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून महिला व बाल रुग्णालयाचे काम सुरू आहे. नागपुरातील मेंढे नामक कंत्राटदाराने या रुग्णालयाचे काम केले. अपेक्षेपेक्षा एक वर्ष जास्त वेळ या कंत्राटदाराने घेतला. गेल्या चार महिन्यापासून इमारतीकडे लक्ष घातले तर रुग्णालय पूर्ण झाल्याचे प्रत्येकांनाच वाटते. रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असली तरी रुग्णालयातील बरेच काम शिल्लक आहे. रुग्णालयामध्ये आतील काम मोठे आहे. शस्त्रक्रिया कक्ष व अन्य कक्ष अत्याधुनिक सोयीसुविधासह तयार करावे लागतात. यात फर्निचरचे काम प्रामुख्याने असते. हे काम सुरू झाले असल्याची माहिती आहे. सुरू असलेले फर्निचरचे काम पूर्ण व्हायला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे या क्षेत्राशी संबंधित असलेल्या जाणकारांनी सांगितले. रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यानंतरच डॉक्टर व कर्मचारी वर्ग येथे नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
सुरू असलेली कामे बाहेरून दिसत नाहीत. कामे आत सुरू आहेत. यामुळे सदर रुग्णालय कधी सुरू होईल हा प्रश्न प्रत्येक स्थानिकांना पडला आहे. या रुग्णालयाच्या बांधकामाबाबत चौकशी केली असता आतील काम सुरू असल्याचे सांगण्यात आल्याने व तीन महिने कामाला लागणार असल्याने तीन महिन्यानंतरच या रुग्णालयाला सुरुवात होईल असे दिसते.
येथे गर्दी
अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा सिरोंचासह तेलंगणा राज्यातील रुग्णांचा मोठा भार उपजिल्हा रुग्णालय अहेरीवर पडत आहे. तेलंगणा राज्यातील 30 ते 40 गावे अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ घेतात. यामुळे उपजिल्हा रुग्णालयावर अतिरिक्त भार पडत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून उपचार करावे लागत आहे. यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत. रुग्णालयाच्या वरांड्यात खाटा टाकून रुग्णांची कशीबशी व्यवस्था होत आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीत रुग्ण उपचार करून घेत आहे. महिला व बाल रुग्णालय सुरू झाल्यास जवळपास 50% भार कमी होईल आणि वेगवेगळ्या रुग्णांना वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करणे सोयीचे होणार आहे. यामुळे महिला व बाल रुग्णालय लवकरात लवकर सुरू व्हावे अशी जनतेची अपेक्षा आहे.
